Breaking News

साखरपुड्याच्या प्रश्‍नावर विराटने मौन सोडलं!

मुंबई, दि. 30 - टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे नववर्षात साखरपुडा करणार असल्याची बातमी कालच आली. मात्र त्याबाबत स्वत: विराट कोहलीनेच प्रतिक्रिया दिली आहे. विराट म्हणाला, आमचा साखरपुडा ठरलेला नाही, जेव्हा ठरेल तेव्हा आम्ही लपवणार नाही. काही न्यूज चॅनेलवर आमच्या साखरपुड्याबाबत चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे हा गोंधळ दूर करुन त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न मी करत आहे सध्या विराट आणि अनुष्का न्यू इयर सेलिब्रेशनसाठी उत्तराखंडमधील नरेंद्रनगरच्या हॉटेल आनंदामध्ये आहेत.
विराट आणि अनुष्का मागील काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नव्या वर्षात दोघांचा सारखपुडा होईल असं म्हटलं जात आहे. ज्या हॉटेलमध्ये दोघे थांबले  आहेत, तिथे नातेवाईंकाचा राबता वाढत आहे. एका वृत्तपत्रानुसार, या दोघांच्या साखरपुड्याला उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावतही 1 जानेवारीला इथे पोहोचणार  आहे. मात्र साखरपुड्याबाबत अनुष्का आणि विराटकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नव्हता. अखेर आज स्वत: विराटनेच याबाबत मौन सोडलं आहे. विशेष  म्हणजे विराट कोहली उत्तराखंडचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर आहे.
दरम्यान,विराट आणि अनुष्का बुधवारी रात्री हरिद्वारमध्ये आपल्या गुरुचा आशिर्वाद घेताना दिसले. त्यानंतरच त्यांच्या साखरपुड्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं.  बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि उद्योगपती अनिल अंबानी यांसारखे पाहुणे उत्तराखंडमध्ये पोहोचल्याने, विराट-अनुष्काच्या साखरपुड्याबाबतच्या चर्चांनी  जोर घेतला. मात्र आता स्वत: विराटने ट्विटरवरुन याबाबत स्पष्टीकरण दिलं.