Breaking News

आजपासून 4,500 रुपये एटीएम मधून काढता येणार

नवी दिल्ली, दि. 01 - आजपासून तुम्हाला एटीएमएमधून अडीच हजारांऐवजी साडेचार हजार रुपये काढता येणार आहे. नोटाबंदीच्या घोषणेनंतर एटीएममधून पैसै काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती. मात्र, नवीन वर्षात ही मर्यादा काही प्रमाणात शिथील करण्यात आली आहे. आठवड्याला बँक खात्यातून 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. आरबीआयच्या परिपत्रकानुसार आजपासून (1 जानेवारी) हा नवा नियम लागू होणार आहे.
8 नोव्हेंबरला मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. एटीएममधून केवळ सुरुवातीला फक्त 2500 रुपये काढता येत होते. मात्र, आता ही मर्यादा वाढविण्यात आली असून आता एकावेळी 4500 रुपये काढता येणार आहेत. गेले अनेक दिवस पैशांची चणचण नागरिकांना भासत होती. या निर्णयानं देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा जरी वाढली असली तरीही बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेत अद्याप कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आतापर्यंत थेट बँकेतून चेकद्वारे किंवा स्लीपनं 24000 रुपये काढता येत होते. ही मर्यादा सध्या तरी कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, एटीएमच्या मर्यादेत वाढ करुन सरकारनं नववर्षाचं अनोखं गिफ्ट दिलं आहे.