Breaking News

जावडेकरांची ‘बढती’, आठवले आणि भामरेंची राज्यमंत्रीपदी वर्णी !

नवी दिल्ली, दि. 05 -  राजकीय अटकळींना पूर्णविराम देत, राष्ट्रपती भवनाच्या ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये छोटेखानी कार्यक्रमात मंगळवारी नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा दुसर्‍यांदा विस्तार झाला असून, या कार्यक्रमात एकूण 19 खासदारांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्रातून वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कॅबीनेटपदी बढती देण्यात आली तर, रिपब्लिकन नेते रामदास आठवले व धुळयाचे खासदार सुभाष भामरे यांना राज्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली. राज्यातील या दोन मंत्र्यांना नेमकी कोणती खाती मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान एस एस अहलुवालिया, फग्गनसिंह कुलस्ते, एम जे अकबर, रमेश जिगजिनागी, विजय गोयल, रामदास आठवले, राजन गोहेन, अनिल माधव दवे, पुरूषोत्तम रूपाला, अर्जुन राम मेघवाळ, जसवंतसिंह बाभोर, डॉ. महेंद्रनाथ पांडे, अजय टामटा, अनुप्रियया पटेल, कृष्णा राज, पी पी चौधरी, मनसुख मंडाविया, पी पी चौधरी व सुभाष भामरे, या 19 खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतांना आठवले चक्क स्वतःचेच नाव विसरले, राष्ट्रपतींनी त्यांना त्यांच्याच नावाची आठवण करून दिली. दरम्यान, या विस्तारामुळे मोदी सरकारमधील मंत्र्यांची संख्या 66 वरून 82 वर गेली आहे. या मंत्रिमंडळात पाच अनुसूचित जाती, दोन अल्पसंख्यांक आणि दोन महिलांना स्थान मिळाले आहे.
सध्याच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. यामध्ये रसायने आणि खते खात्याचे राज्यमंत्री निहालचंद, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री राम शंकर कथेरिया, सवंरलाल जाट, मनसुखभाई वासवा, एम. के कुंदरिया यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. मोदी यांनी गेल्या आठवड्यात 30 जून रोजी मंत्रिमंडळातील विविध खात्यांचा आढावा घेतला होता. त्यावेळीच काही जणांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार हे निश्‍चित झाले होते.
दरबार हॉलमधील या शपथविधी समारंभाला नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा व संघटनमंत्री रामलाल, ज्येष्ठ मंत्री राजनाथसिंह, नितीन गडकरी, अरूण जेटली आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी विविध कारणांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. भाजप संघटना (शहा) व सरकार (मोदी) यांतील ‘परफेक्ट‘ समन्वय यानिमित्ताने पुन्हा दिसून आला. आज वर्णी लागलेल्यांपैकी बहुतेक जणांनी काल शहा यांच्या निवासस्थानी पायधूळ झाडली होती. शिवसेना या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याची चर्चा होती. मात्र मंत्री अनंत गीते हे कार्यक्रमाला उपस्थित होते.
हा तर भाजपचा मंत्रिमंडळ विस्तार : सेना
हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारचा नव्हे तर भारतीय जनता पक्षाचा मंत्रिमंडळ विस्तार असल्याची टीका शिवसेनेने मंगळवारी केली आहे.
शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, आज संधी देण्यात आलेले सर्व चेहरे हे भाजपमधील आहेत. आठवले हे भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत आहेत. तर अनुप्रिया पटेल यांचा पक्ष भाजपसोबत आहे. त्यांनी अकाली दलाला किंवा तेलुगु देसमला निमंत्रित केले नाही.‘ तसेच ‘त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सहभाग नसल्याची आम्हाला काहीही चिंता नाही‘, असेही ते पुढे म्हणाले.