Breaking News

केंद्राच्या भूमिकेने तोंडघशी पडले निहलानी

मुंबई, दि. 09 -  केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्याही खुशमस्कर्‍याची किंवा चमच्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. रविशंकर प्रसाद निहलानी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य करताना म्हणाले की, माझ्या मते अशाप्रकारची वक्तव्ये करणे टाळले पाहिजे. पंतप्रधानांनी स्वत:हूनच ते संपूर्ण देशाचे प्रधान सेवक असल्याचे सांगितले आहे. मला वाटत नाही की, प्रधान सेवकांना कोणत्याही खुशमस्कर्‍याची गरज आहे, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. तसेच सरकार सर्जनशीलतेच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करते असे सांगताना सेन्सॉर बोर्डाच्या कारभारात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रविशंकर प्रसाद यांच्या या वक्तव्यामुळे मोदींचा स्वत:ला चमचा म्हणवून घेणारे पहलाज निहलानी चांगलेच तोंडघशी पडले आहेत. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी काल केलेल्या विधानामुळे ‘उडता पंजाब’ चित्रपटावरून निर्माण झालेला वाद विकोपाला गेला होता. होय, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चमचा असून, मला त्याचा अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले होते. मी इटालियन पंतप्रधानांचा चमचा बनावे का, असा प्रतिसवाल करीत निहलानी यांनी अनुराग कश्यपबाबत केलेल्या आरोपावरून माफी मागण्याची किंवा राजीनामा देण्याची मागणी फेटाळून लावली होती.