Breaking News

मोदी लाट ओसरत चालली आहे : शरद पवार

मुंबई, दि. 11 -  लोकसभेत भाजपने मोदी लाटेमुळे घवघवीत यश मिळवले असले, तरी ही लाट गेल्या दोन वर्षांत ओसरत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नेते शरद पवार यांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या 17 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात केली.
त्यांनी यावेळी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, भाजपला लोकसभेत मोदींमुळे यश मिळाले. त्यावेळी भारतात मोदींची लाट होती. मात्र, बिहार, पश्‍चिम बंगाल, केरळ आणि दिल्ली येथील विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप व मोदींना नाकारले आहे. आसामच्या विजयाचे संदर्भ वेगळे आहेत. यावरूनच स्पष्ट होते की, आता भारतातून मोदी लाट ओसरत आहे. सत्तेत येऊन दोन वर्ष होऊन गेले. मात्र अद्याप कोणतेही बदल देशात दिसत नाहीत. मोदी केवळ जाहिरातबाजीकडे लक्ष देत आहेत, अशा शब्दांत त्यांनी भाजप सरकारच्या मार्केटिंग धोरणावर तोफ डागली.
शेतीचा जाण असलेला कृषिमंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात नसल्यामुळे दोन वर्षात अन्नधान्य उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे निर्यातीवरही परिणाम होत आहे. जेव्हा मोदी परदेशात जातात; तेव्हा ते भारताचे पंतप्रधान म्हणून जात नाहीत. तेथे भाजपचे प्रतिनिधी म्हणून जातात. परदेशात जाऊन काँग्रेसवर टीका करणे हे चुकीचे आहे, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.