Breaking News

2017 ची आयपीएल विदेशात हलविण्याचा विचार : शुक्ला

पुणे, दि. 23 - राज्यावर दृष्काळाचे सावट आयपीएल पूर्वीचे आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टी20 वर्ल्डकपचे 4 सामने महाराष्ट्रात झाले. तेव्हा आक्षेप झाला नाही. मात्र, आयपीएल सुरू होताच; खेळाडूंना खेळू देणार नाही, पाणी देणार नाही असे अडथळे निर्माण होत असतील तर पुढील वर्षी आयपीएल देशाबाहेर हालविण्याबाबत विचार करावा लागणार असे आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला शुक्रवारी पुण्यात म्हणाले.
शुक्ला म्हणाले ,“ गेल्या काही वर्षात आयपीएल हा जगप्रसिध्द ब्रँन्ड बनला असून जगभरातील सर्वच देशात सामने पाहिले जातात. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी कोणत्याही गोष्टींना विरोध केला जात नाही. स्पर्धा सुरू होताच विविध कारणे शोधून स्पर्धेला अडथळा निर्माण केला जातो. एखादा ब्रँड निर्माण करण्यास वेळ लागतो. मात्र, तो पाडण्यास काहीच वेळ लागत नाही. त्यामुळे आयपीएलबाबत सुरू असलेल्या विरोधाच्या घटना पाहता या वर्षीच्या स्पर्धाच्या पुढील नियोजनावर आमचे लक्ष आहे.’’ तसेच, “राज्यातील दुष्काळाबाबत आपण संवेदनशिल असून दुष्काळ निवारणासाठी दिर्घकालीन उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यशासनास सहकार्य करण्याची आमची तयारी असून पाणी न वापरणे अथवा स्पर्धा राज्याबाहेर हलविणे हे दुष्काळावर उपाय होणार नाहीत. ही बाब लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जावा,’’ अशी अपेक्षा शुक्ला यांनी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार
आयपीएलचे राज्याबाहेर हालविण्यात आल्याने मुंबई व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला फटका बसला आहे. मुंंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा त्यांना अधिकार असल्याचेही शुक्ला म्हणाले.