बाबरी मशीद अयोध्येतच पुन्हा उभी राहणार- ओवेसी
औरंगाबाद – ६ डिसेंबरला बाबरी मशिद घटनेला २३ वर्षे झाली असून मुंबई स्फोटातील आरोपींना फाशी दिली; मात्र बाबरी प्रकरणातील दोषींना उलट चांगली पदे दिली, त्यांना शिक्षा केलीच नाही. सर्वोच्च न्यायालयाकडे राम मंदिराचा मुद्दा अद्याप न्यायप्रविष्ठ असल्यामुळे राममंदिर उभारणीचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होणे अशक्य आहे. मात्र, बाबरी मशीद एक दिवस नक्की होईल, असा विश्वास एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद येथील सभेत व्यक्त केला. ओवेसींनी यावेळी भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेवरही जोरदार टीका केली. तसेच मुस्लीम समाजाशी इसिसचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ओवेसी म्हणाले की,
जर का डॉ. बाबासाहेबांनी घटना तयार केली नसती, तर आज हा देश हिंदू राष्ट्र झाला असता. राजकारणात व्यक्तीपूजा म्हणजे हुकुमशाहीकडे वाटचाल असते. दलित-मुस्लिमांचे देशात आणि राज्यात ऐक्य करून हे सर्व जगाला दाखवून देऊ. पण दलित-मुस्लिमांना काँग्रेस, भाजप हे एकत्र येऊ देत नाहीत. भडकावू भाषण आम्ही करत असल्याचा आरोप केला जातो; मात्र आम्ही फक्त तुम्ही केलेल्या अन्यायाला चव्हाट्यावर आणत आलो आहोत. डॉ. बाबासाहेब यांनी देश सोडला नाही, हे सांगता मग बाबासाहेबांनी धर्म सोडला, हे का सांगत नाहीत? असा सवालही असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना केला.