Breaking News

पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटनांकडे पालिकेचे दुर्लक्ष



संगमनेर (प्रतिनिधी)- पावसाळा सुरु झाला असतानाही दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या गेल्या नाही. दरवर्षीचा अनुभव असतांनाही संगमनेर नगरपालिका प्रशासनाचे विविध उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

प्रवरा, म्हाळुंगी व इतर छोट्या नद्यांना दुरवर्षी छोटे मोठे पूर येतात. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होते. तुंबणाऱ्या गटारींमुळे रस्त्यांवर पाणी साठणे, रस्त्यावरून पाणी वाहने हे प्रकारही दरवर्षी होत असतात. मोडकळीस आलेली घरे, धोकादायक इमारती, रस्त्यावर असणारे खड्डे, जीर्ण वृक्ष असे संभाव्य धोके असतांनाही याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

संगमनेर शहरात जुलै, ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, या पावसामुळे शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. संगमनेर-अकोले तालुक्याती कोसळणाऱ्या पावसामुळे प्रवरा, म्हाळुंगी नदीला पूर येतो. या पुरामुळे नदी काठी राहणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होतात. याशिवाय म्हानुरी नाटकी या छोट्या नद्यांनाही अधुन-मधुन पुर येतात.

नदीकाठावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याने म्हानुरी नाटकी या नद्यांचे पात्रच गायब झाले आहे. काही वर्षांपूर्वी नाटकी नदीला रात्री अचानक मोठा पूर आल्यामुळे सुकेवाडी रस्त्यावर असणारी पुनर्वसन कॉलनी पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. हा अनुभव ताजा असतांनाही पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

इतर नद्यांची अशीच अवस्था आहे. संभाव्य धोक्याची कल्पना असतांनाही पालिकेने सुरक्षिततेचे ठोस पावले उचलली नाही.

शहर व परिसरात अनेक मोठी मोठी वृक्ष कोसळण्याच्या मार्गावर आहे. नागरिकांच्या तक्रारी असुनही ही झाले तोडण्यात येत नाही. मोठ्या वादळात ही झाडे पडल्यास नुकसानीची शक्यता आहे. शहरातील गटारी नेहमी तुबतात या गटारीची स्वच्छता करणे गरजेचे आहे.

पावसाळ्यात दरवर्षी शहरातील रस्ते खराब होत असतात. शहरातील रस्ते दुरुस्ती सुरु असली तरी यात मोठा भेदभाव होत असल्याच्या तक्रारी आहे. अनेक रस्ते खराब असतात हे रस्ते दुरुस्त करण्याऐवजी नगराध्यक्षांच्या प्रभागातील रस्तेच दुरुस्त होताना दिसत आहे. नगराध्यक्षाच्या घरासमोरील रस्ता चकाचक केला जात असतांना शहरातील अनेक रस्त्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संगमनेर नगरपालिकेने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.