Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार पालघर पोटनिवडणुक : मुख्यमंत्र्याकडून पदाचा गैरवापर केल्याचा आरोप

पालघर : भारतीय जनता पक्षाकडून पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा प्रचंड दुरुपयोग सुरु असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे सराईत दोषी झाले आहेत. त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

काँग्रेस शिष्टमंडळाने आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिका-यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार केली. यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना सावंत म्हणाले की, गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री जनतेला खोटी आश्‍वासने देऊन, आमिषे दाखवून आणि निर्णय घोषीत करून पदाचा दुरुपयोग व आदर्श आचारसंहितेचा भंग करित आहेत. कल्याण डोंबिवली महानगपालिका व पेण नगरपालिका निवडणुकीत त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. परंतु दुर्देवाने त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. दिनांक 20 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी पालघर लोकसभा क्षेत्रात भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभांमध्ये खावटी कर्ज माफ करू, पालघरला वैद्यकीय महाविद्यालय उभारू, वसई विरार महापालिका क्षेत्रातून 29 गावे वगळू अशा घोषणा केल्या त्यावर निवडणूक आयोगाने याची स्वतः दखल घेऊन कारवाई करणे अभिप्रेत होते परंतु आयोगाने कारवाई न कल्याने नाईलाजाने काँग्रेस पक्षाला तक्रार करावी लागली असे सांगून निवडणूक आयोग सरकारच्या दबावाखाली आहे का? असा प्रश्‍न जनमानसाच्या मनात उपस्थित होत आहे असे सावंत म्हणाले.