Breaking News

सहकार चळवळीने शेतीची प्रगती : आ. थोरात



संगमनेर, १९६५ ते १९९० चा काळ हा शेतीसाठी खूप महत्वाचा ठरला. सहकारी चळवळ फोफावल्यानंतरच्या २५ वर्षांत शेतीची खूप प्रगती झाली. आज जेव्हा हरितक्रांतीची चर्चा होते आणि किटकनाशक फवारणी करणार्‍या ७० शेतकर्‍यांचा जीव जातो, तेव्हा पुन्हा एकदा नवा विषय हातात घेवून काम करावे लागेल असे वाटते. किटनाशकविरहीत अन्न हाच विषय यापुढे घ्यावा लागेल, असे मत राज्याचे माजी कृषीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

शारदानगर येथे पद्मश्री अप्पासाहेब पवार प्रयोगशील शेतकरी पुरस्काराचे वितरण माजी कृषीमंत्री आ. थोरात यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार होते. यावेळी ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्‍वस्त सुनंदा पवार, विश्‍वास देवकाते, नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे, संजय भोसले, विजय बोराडे, डॉ. व्यंकट मायंदे, डॉ. नारायण हेगडे, अशोक गायकवाड, डॉ. एस. एन. जाधव, डॉ. सुदाम अडसूळ, डॉ. शंकरराव मगर, राजीव देशपांडे, रणजित पवार, डॉ. अविनाश बारवकर, विष्णुपंत हिंगणे आदी उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, राज्यातील शेतीतील प्रगतीच्या क्रांतीचे अग्रदूत खरेतर डॉ. अप्पासाहेब पवार, डॉ. मणिभाई देसाई, वसंतदादा पाटील, शरद पवार असे सर्व होते. अप्पासाहेब पवार हे संगमनेर तालुक्यासाठी व माझ्यासाठी खूप जवळचे मार्गदर्शक होते. डॉ. अण्णासाहेब शिंदे, डॉ. देसाई व डॉ. अप्पासाहेब हे हरितक्रांतीतील अग्रदूत होते. शेतीसाठी आधुनिकतेसाठी शेतकर्‍याला प्रोत्साहित करणे, ठिबकद्वारे पाणी देणे यासाठी अप्पासाहेबांनी खूप मोठे योगदान दिले. त्यांच्यानंतरही हे काम राजेंद्र पवार अधिक वेगाने पुढे नेत आहेत, हे कौतुकास्पद आहे. राज्यातील प्रयोगशील शेतकर्‍यांना पुरस्कार दिले जात आहेत. यावेळी राज्यातील चार शेतकर्‍यांचा पद्मश्री अप्पासाहेब पवार, प्रयोगशील आणि प्रगतशील शेतकरी पुरस्कार देवन गौरविण्यात आले.