Breaking News

राम मंदिराचा प्रश्‍न न्यायालयाबाहेर सुटणार ? श्री श्री रविशंकर सुन्नी वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांसोबत चर्चा

नवी दिल्ली : राममंदिराच्या मुद्द्यावर श्री.श्री. रवीशंकर यांनी मुस्लीम धर्मगुरुंशी बंगळुरुमध्ये पुन्हा एकदा चर्चा केल्यामुळे राम मंदिराचा प्रश्‍न न्यायालयाबाहेर चर्चेच्या माध्यमातून सुटणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या बैठकीत काही प्रस्तांवांवर नव्याने विचार करण्यात आला असून, वादग्रस्त जागीच राममंदिर बांधण्याबाबत चर्चा झाली. तसेच मस्जिदसाठी वेगळी जागा देण्यावरही चर्चा झाली. सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारुखीही या बैठकीत सहभागी झाले होते. राम मंदिर- बाबरी मशिदीचा हा वाद सामोपचाराने मिटवण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. 

सहा सदस्यांच्या या शिष्टमंडळात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे कार्यकारी अधिकारी मौलाना सलमान हुसैनी नदवी, उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारुकी, तत्कालीन आयएएस अधिकारी अनीस अन्सारी, इम्रान अहमद, मौलाना वासिफ हसन वैजी, ऑब्जेक्टिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे संचालक अतहर हुसैन हे होते. बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाढलेल्या तणावासंबंधीही चर्चा झाली. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मार्चमध्ये बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक अयोध्येत होईल, अशी माहिती अतहर हुसैन यांनी दिली. ’कोणत्याही परिस्थितीत समझोता करण्याची वक्फ बोर्डाची तयारी आहे. दोन्ही पक्षकारांनी एकत्र चर्चा करण्याची गरज आहे,’ असे फारुकी यांनी सांगितले. या बैठकीत बेंगळुरूतील काही संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. एकूण 16 संघटनांनी सहभाग घेतला होता. सौहार्दाने या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा श्री श्री रविशंकर यांचा उद्देश आहे. मार्चमध्ये होणार्‍या बैठकीपूर्वी या महिन्यात ते अयोध्येत जाणार आहेत, असे श्री श्रींचे प्रवक्ते गौतम यांनी सांगितले.