Breaking News

दमानिया न्यायालयापासून दूर का पळता? एकनाथ खडसेंचा सवाल

जळगाव : अंजली दमानिया यांनी आपल्यावर केलेल्या बेछूट आरोपात काहीही तथ्य नसल्याचे दिसून आले असून, त्यांनी केवळ आपल्या प्रसिद्धीसाठी हा उद्योग केला आहे. आरोपात तथ्य होते, तर न्यायालयापासून दूर का पळता, असा सवाल माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 


दरम्यान, दमानिया यांनी रावेर कोर्टात आपल्या वकिलांमार्फत अर्ज देऊन आपल्यावर झालेली शस्त्रक्रिया व सासूबाई हॉस्पिटलमध्ये असल्याचे कारण देत आपण उपस्थित राहू शकत नसल्याचे कळवल्यानंतर त्यांच्याविरोधात काढलेले अटक वॉरंट न्यायालयाने रद्द केले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसे यांच्या स्वीय सहायकाने लाच घेतली, जावयाचे कारप्रकरण, भोसरीभूखंड प्रकरण, अशा विविध प्रकरणी खडसेंवर आरोप केले होते. हे आरोप केल्याने खडसेंची व भाजपाची बदनामी होत असल्याने राज्यात 27 ठिकाणी दमानियांविरोधात अब्रुनुकसानीचे खटले दाखल करण्यात आले असून, त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, चौकशीत काहीही तथ्य नसल्याचा दावा खडसे यांनी केला.