Breaking News

शिवसेना सरकारचा पाठिंबा काढू शकत नाही : अजित पवार

परभणी : राज्यात आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नाही. आजच शिवसेनेने घोषणा केली लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार, अरे असे कशाला करता हिंमत असेल तर काढा ना पाठिंबा सरकारचा, पण सत्तेची ऊब घेतलेल्या शिवसेनाला ते करणे शक्य नाही. शिवसेनेची ही दुटप्पी भूमिका आहे, असा थेट आरोप विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पाथरीच्या जाहीर सभेत केला.


आपल्या भाषणामध्ये पेट्रोल-डिझेलच्या वाढवलेल्या दराबाबत सरकारवर हल्लाबोल करत पवार म्हणाले की महाराष्ट्र वगळता इतर राज्यामध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कसे आहेत यांची आकडेवारी जाहीर सभेत जनतेसमोर मांडली. दिल्लीमध्ये 72 रुपये आणि महाराष्ट्रामध्ये 81 रुपये म्हणजेच 8 रुपयांचा फरक आहे. तोच दर गुजरातमध्ये 71 रुपये म्हणजेच 10 रुपयांचा फरक आहे.महाराष्ट्र सर्वकाही देत असताना पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रातच जास्त का असा सवाल अजित पवारांनी सरकारला केला. शेतकर्‍यांच्या पीक विम्याबाबत सरकारच्या भूमिकेवरही पवारांनी हल्ला केला. पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये शेतकर्‍याला लाभ मिळण्याऐवजी तो लाभ कंपनीला कसा मिळत आहे याची सविस्तर माहिती जनतेसमोर ठेवली. शेतकर्‍यांकडून 22 हजार कोटी रुपये पीकविम्यापोटी जमा केले आणि शेतकर्‍याला पीक विम्याचे मिळाले किती तर फक्त 8 कोटी रुपये. असा अन्याय सरकार शेतकर्‍यावर का करत आहे असा संतप्त सवालही अजित पवार यांनी सरकारला केला. पाथरीच्या जाहीर सभेमध्ये जिंतूर, गंगाखेड, पाथरी, परभणीसह सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणा तुम्हाला योग्य तो न्याय देण्यात येईल असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.