Breaking News

व-हाडाच्या वाहनाला अपघात; एक ठार, आठ गंभीर

जळगाव,  रावेर तालुक्यातील विवरा येथे इंदौर येथून विवाहानंतर परतणा-या व-हाडाच्या वाहनाला कंटेनरचा कट लागून झालेल्या अपघातात नवरदेवाची मावसबहिण जागीच ठार झाली. तर अन्य आठ व-हाडी गंभीर जखमी झाले. अपघातात तवेरा मध्य प्रदेशातील कटीघाटात तब्बल 30 फूट खाली कोसळली.


काल रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, अपघातात मयत झालेल्या आयेशाबी शेख रशीद (16) या तरुणीवर आज सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
खानापूरचे रहिवासी शेख रशीद शेख रफिक यांचा मोठा मुलगा राजूचा विवाह इंदोरला झाल्यानंतर सर्व वर्हाडी सायंकाळी परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र इंदोर-अमरावती महामार्गावरील कटी घाटात एका कंटेनरचा धक्का लागल्याने व-हाडींची तवेरा 30 फूट खोल दरीत कोसळली. 

याचवेळी व-हाडींची पाठीमागून येणारी वाहने थांबल्याने त्यांनी व- हाडींना बाहेर काढण्यात मदत केली. या अपघातात नवरदेवाची मावसबहीण आयेशा शेख रशीद (16, रा.विवरे ) ही जागीच ठार झाली तर तिचे वडील शेख रशीद शेख छोटू व आई मेहमूनाबी शेख रशीद, तायराबी शेख गनी (रा.विवरे ) यांच्यासह सायराबी, पती शेख रफीक, तायराबी शेख गनी (दोन्ही रा.खानापूर, ता रावेर), शहनाज नदीमखान व फिरोजखान हैदरखान (रा.बिरोदा, ता.ब-हाणपूर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. चालक शालिग्राम दयाराम हा गंभीर जखमी असून त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.