Breaking News

मनसेने सीमेवर पाक सैनिकांना मारावे : आठवले

मुंबई, दि. 22, ऑक्टोबर - मनसे कार्यकर्त्यांना कोणाला मारायचंच असेल, तर त्यांनी सीमेवर जाऊन पाकिस्तानी सैनिकांना मारावं, असा खोचक सल्ला  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. मुंबई-ठाणे रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात मनसेने  केलेल्या आंदोलनानंतर आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांची गुंडागर्दी अशीच सुरु राहिली, तर भीमसैनिक ‘ईट का जवाब पत्थर से देंगे’ असा इशाराही रामदास आठवले यांनी मनसेला दिला  आहे. गरीब बिचार्‍या फेरीवाल्यांच्या रक्षणासाठी वेळ पडल्यास भीमसैनिक रस्त्यावर उतरतील, असंही रामदास आठवले म्हणाले. मनसे कार्यकर्त्यांना  कोणाला मारायचंच असेल, तर त्यांनी सीमेवर जाऊन पाकिस्तानी सैनिकांना मारावं, अशा शब्दात आठवलेंनी मनसेचा समाचार घेतला.
राज ठाकरे यांनी मुंबई-ठाण्यातील रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ खट्यॅक केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांचाही तीळपापड झाला  आहे. मनसे कार्यकर्त्यांनी फक्त परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधातच आंदोलन केल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.