ऑनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती भरणा-या 40 शिक्षकांना देणार नोटीसा
औरंगाबाद, दि. 05, ऑक्टोबर - जिल्हा परिषदेच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया यंदा ऑनलाइन राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षकांना स्वतः पोर्टलमध्ये माहिती भरणे आवश्यक होते. बदलीपात्र शिक्षकांची यादी करताना त्यांनी भरलेल्या माहितीचा आधार घेऊन निकष लावण्यात येणार आहेत. दरम्यान, संवर्गनिहाय माहिती भरण्यात 40 शिक्षकांची खोटी माहिती भरल्याचे निदर्शनास आले आहे. या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांनी पत्रकारांना दिली. वाणी म्हणाले, की ठाामविकास विभागाच्या सूचनेनुसार यंदा जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने मुंबईतून राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोर्टलमध्ये संवर्गनिहाय माहिती सादर करताना शिक्षकांनी खरी माहिती भरणे आवश्यक आहे. अनेक शिक्षकांनी खोटी माहिती भरल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. त्याची चौकशी केल्यानंतर 35 ते 40 शिक्षकांची खोटी माहिती भरल्याचे समोर आले. संवर्ग दोनमध्ये पती, पत्नीच्या नोकरीच्या ठिकाणातील अंतर 30 किलोमीटरपेक्षा जास्त सेल, तर त्यांनी बदलीसाठी अर्ज भरणे अपेक्षित होते, पण अनेकांनी चुकीची अंतरे भरून अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व शिक्षकांना नियमानुसार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहेत.