Breaking News

पाक लष्कराच्या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद

जम्मू काश्मीर, दि. 23 - पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने नियंत्रण रेषेवर पुन्हा एकदा भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद  झाले आहेत. औरंगाबादचे रहिवासी असलेले नाईक संदीप जाधव आणि कोल्हापूरचे रहिवासी असलेले शिपाई श्रावण बाळकू माने हल्ल्यात शहीद झाले. 35 वर्षीय  संदीप जाधव गेली 15 वर्ष लष्कराच्या सेवेत होते, तर 25 वर्षीय माने 4 वर्षांपूर्वीच सेवेत रुजू झाले होते.
जम्मूमधील पुंछ विभागात पाकिस्तानी लष्कराच्या ‘बॅट’ तुकडीने हा हल्ला केला. भारतीय लष्कराने प्रत्युत्तरदाखल केलेल्या हल्ल्यात बॅटचा एक सैनिक ठार झाला, तर  एक सैनिक जखमी झाला. गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जम्मूमधील पुंछ विभागात बॅटच्या टीमने नियंत्रण रेषेच्या आत सुमारे 600 मीटरपर्यंत घुसखोरी  केली. पाकिस्तानी लष्कराने गोळीबार करत त्यांना संरक्षण दिले.
बॅटच्या सैनिकांनी गस्त घालत असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांवर हल्ला केला. यात लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आले. त्यानंतर भारतीय लष्करानेही  बॅटच्या टीमवर प्रतिहल्ला केला. यात बॅटचा एक सैनिक ठार झाला. तर एक जण जखमी झाला.