Breaking News

जालना जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

जालना, दि. 30 - जालना जिल्ह्यात आज एकाच दिवशी दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे.
अंबड तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी कैलास मोताळे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळल्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली. मोताळे यांच्याकडे साडेचार एकर जमीन आहे, मात्र त्यांच्यावर दोन लाखांचं कर्ज होतं. तर घनसावंगी तालुक्यातील मांदळा गावातील शेतकरी गोविंदराव धबडकर यांनी विष प्राशन करुन आयुष्य संपवलं आहे. धबडकर यांच्यावरही बँक ऑफ महाराष्ट्रचं 2 लाख 15 हजारांच कर्ज होतं. दोनही शेतकर्‍यांनी कर्ज फेडण्याच्या विवंचनेतूनच आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. या आत्महत्येच्या दोन्ही घटनांमुळे जालना जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे.