Breaking News

बीडमध्ये अवकाळी पावसाचा कहर, परळीत वीज पडून दोघांचा मृत्यू

बीड, दि. 16 - लातूरनंतर अवकाळी पावसाने बीड जिल्ह्याकडे कूच केली आहे. परळी तालुक्यातील कौठाळी शिवारात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जनावरं दगावल्याची घटना घडली आहे. गटशेतीसाठी पुढाकार घेणारे परळी तालुक्यातील इंजेगावचे प्रयोगशील शेतकरी नाथराव कराड यांच्या शेडनेटं मोठं  नुकसान झालं आहे. वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने शेडनेटमधील मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे.
शिवाय लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांनाही गारपीटीचा फटका बसला. जिल्ह्यातील अर्जुनेश्‍वर देवस्थान येथील जुनं चिंचेचं झाड कोसळल्याने गाड्यांचं नुकसान झालं.  लातूरमध्ये दुपारी 12 वाजल्यापासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली. शिवाय उस्मानाबाद, सोलापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला.  त्यानंतर आता बीड जिल्ह्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांची धाकधूक वाढली आहे. कारण हाताशी आलेलं पीक वाया  जाण्याची चिन्हं आहेत. अनेक ठिकाणी गहू पिकाची काढणी झाली असल्याने त्याचं पावसाने मोठं नुकसान झालं आहे.