Breaking News

खडसेंच्या आरोपांना ऊर्जामंत्री बावनकुळेंचं विधानसभेत उत्तर

मुंबई, दि. 30 - वीजदरवाढ सरकार करत नाही, मुळात कोणतीही वीजदरवाढ झालेली नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. भाजपमधील सर्वात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भर विधानसभेतच सरकारची कानउघडणी केली. त्यानंतर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मी विदर्भातील मंत्री म्हणून विदर्भाकडे जास्त बघतो हा आरोप चुकीचा असल्याचा दावा बावनकुळेंनी केला. उत्तर महाराष्ट्र ,पश्‍चिम महाराष्ट्राला वीज कनेक्शन देणार नाही, असं नाही. जळगाव जिल्हा आणि शहरासाठी वेगवेगळ्या योजनांमधून आपण निधी देत असल्याचंही बावनकुळे म्हणाले. जून 2017 पर्यंत जळगावमधल्या पायाभूत सुविधा पूर्ण करुन खडसेंच्याच हस्ते उद्घाटन करण्याचं आश्‍वासन त्यांनी दिलं.
राज्यात 1700 कोटींची वीज बिल थकीत आहे. सध्या तरी मुख्यमंत्र्यांनी वीज कनेक्शन कापू नये, असे आदेश दिले आहेत. परंतु आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. बागायतदार आणि निर्यातदार शेतकर्‍यांबाबत वेगळा निर्णय घेण्याचे संकेत त्यांनी दिले. कोणतीही वीजदरवाढ झालेली नाही. वीजदरवाढीबाबत पेपरमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. मुळात मी म्हणजे सरकार दरवाढ करत नाही. चएठउ म्हणजे महाराष्ट्र वीज नियामक आयोग ही दरवाढ करते, असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं. वीज दरवाढ करण्याबाबत सध्या फक्त मागणी केलेली आहे. अद्याप आदेश दिलेले नाहीत, असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं.