Breaking News

कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात, पुण्यात इंग्लंडशी लढाई

पुणे, दि. 15 - भारतीय क्रिकेटमध्ये नव्या युगाची सुरुवात होणार आहे. भारत आणि इंग्लंड संघांमधल्या वन डे मालिकेची पहिली लढाई पुण्यात रंगणार असून, त्यात विराट आणि धोनी त्यांच्या कारकीर्दीतली नवी इनिंग सुरू करणार आहेत. धोनीनं भारताच्या वन डे आणि ट्वेन्टी20 संघांच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, ती जबाबदारी आता विराटच्या खांद्यावर आली आहे. तर माही यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पहिल्यांदाच कोहलीच्या हाताखाली खेळणार आहे.
धोनी आणि कोहलीबरोबरच युवराज सिंगचं पुनरागमन हेही या वन डे मालिकेचं वैशिष्ट्य ठरणार आहे. युवराजला जवळपास दहा महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाची संधी मिळाली आहे. तर 2013 नंतरचा त्याचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय वन डे सामना ठरणार आहे. युवराजबरोबरच दुखापतीतून सावरून पुनरागमन करणारा सलामीवीर शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे या दोघांच्याही कामगिरीवर भारतीय चाहत्यांची नजर राहील.
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारताच्या विजयात फिरकी गोलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली होती. वन डेतही रवीचंद्रन अश्‍विन, रवींद्र जाडेजा आणि अमित मिश्राकडून टीम इंडियाला त्याच कामगिरीची अपेक्षा आहे. इंग्लंडविरुद्ध मालिकेत जसप्रीत बुमरा, भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव या वेगवान गोलंदजांचा वापर कोहली कसा करून घेतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
कोहलीच्याच नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं दोन वर्षांत कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी बजावली आहे. भारतानं कसोटीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरही पुन्हा कब्जा केला. तर वन डेत भारताला संमिश्र यश मिळालं. 2015 साली टीम इंडियानं वन डे विश्‍वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतरच्या 24 वन डे सामन्यांपैकी 11 सामने भारतानं गमावले. भारताला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशातील मालिका गमावल्या तर झिम्बाब्वेमधील मालिकेत तसंच भारतातील न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत विजय साजरा केला. आता इंग्लंडविरुद्धची मालिका ही भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी आपली अस्त्रं तपासून पाहण्यासाठी महत्त्वाची संधी ठरणार आहे.