Breaking News

मोफत पाठ्यपुस्तकांची रक्कम थेट विद्यार्थ्याच्या खात्यावर होणार जमा

पुणे, दि. 13 - सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. यापुढे विद्यार्थ्यांना थेट पुस्तके देण्याऐवजी त्यासाठीची रक्कम  विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये झीरो बॅलन्स खाती उघडण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक  शिक्षण परिषदेने सर्व प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत.
यासंदर्भात राज्य सरकारने 5 डिसेंबर रोजी आदेश काढून विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तू स्वरूपात मिळणार्‍या लाभाचे हस्तांतर, रोख स्वरूपात थेट  लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले आहे. त्या खात्याला संबंधित लाभार्थ्यांचा आधार क्रमांक जोडण्यासही सांगितले आहे. त्यानुसार कल्याणकारी  योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्यांचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. सध्या राज्यातील सगळ्याच विद्यार्थ्यांची बँकेमध्ये खाती नाहीत. शासनाच्या  कोणत्याही योजनांचा लाभ त्यांना देण्यापूर्वी त्यांची खाती बँकेमध्ये असणे आवश्यक आहे.
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. ती पाठ्यपुस्तके थेट शाळांमध्ये दिली जात  होती. मात्र, पाठ्यपुस्तके ही लाभाची वस्तू आहे. त्यामुळे यापुढे थेट पाठ्यपुस्तके देता येणार नाहीत. 5 डिसेंबरच्या शासन आदेशानुसार पाठ्यपुस्तकांसाठी  लागणारी रक्कम थेट संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यांवर जमा करावी लागणार आहे. त्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांची खाती बँकेमध्ये असणे आवश्यक आहे.
बँकेमध्ये विद्यार्थ्यांची खाती काढताना त्यासोबत संबंधित विद्यार्थ्यांचा आधार कार्ड क्रमांक नोंदविणेही गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची बँकेमध्ये खाती उघडण्याचे काम  तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खाते न उघडल्यामुळे एखादा विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सगळी जबाबदारी शिक्षणाधिकार्‍यांवर  असेल, असेही आदेशात नमूद आहे. शासनाच्या या नव्या आदेशामुळे मोफत पाठ्यपुस्तके घेणार्‍या अंदाजे दोन कोटी विद्यार्थ्यांची खाती बँकेमध्ये काढावी लागणार  आहेत. याशिवाय इतर वेगळ्या योजनांसाठी सर्वच विद्यार्थ्यांची खाती काढावी लागणार आहेत.