Breaking News

युरोपीय समुदायानं भारतातील भाज्यांवरील बंदी उठवली

मुंबई, दि. 04 - युरोपीय समुदायाने भारतातून आयात होणार्‍या काही भाज्यांवर तीन वर्षांसाठी घातलेली बंदी उठविली आहे, अशी माहिती कृषी मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे. काही अपायकारक घटकांमुळे युरोपीय समुदायाने आंबा, कारले, पडवळ, वांगे आणि अळूच्या आयातीवर बंदी घातली होती. यामुळे भारतीय भाज्यांसाठी युरोपची कवाडे पुन्हा खुली झाली आहेत. तब्बल 3 वर्षांपासून शेतकरी आणि निर्यातदारांना या बंदीमुळे मोठ्या आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागले होते. पण आता पुन्हा एकदा व्यापाराचे दार खुले झाले आहे.
कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मालवाहतूक विभागाच्या वतीने आयोजित परिसंवादाला कृषी मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते. या परिसंवादात अरोरा यांनी युरोपीय समुदायाने भारतातून आयात होणार्‍या भाज्यांवरील बंदी उठविली असून, याबबतचे पत्र कृषी मंत्रालयाला मिळाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. युरोपीय समुदायाने भारतातून आयात होणार्‍या काही भाज्यांवर मे 2014 मध्ये तीन वर्षांसाठी बंदी घातली होती. यात आंबा, कारले, पडवळ, वांगे आणि अळूचा समावेश होता. या भाज्यांमधील काही हानीकारक घटक संपूर्ण युरोपच्या जैवसुरक्षेला धोका निर्माण करणारे असल्याचे युरोपीय समुदायाने म्हटले होते. या निर्णयामुळे भारतातील शेतकरी आणि निर्यातदारांना मोठा फटका बसला होता.