खरीप पीक कर्ज वाटपामध्ये शेतकऱ्यांना त्रास होऊ न देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा पैसा बँकाकडे जमा केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामासाठी खरीप पीक कर्ज देताना कोणतीही अडचण येता कामा नये. विनाकारण शेतकऱ्यांना त्रास दिल्याचे लक्षात आल्यास संबंधित बँकेवर कारवाई केली जाईल. उद्दिष्ट पूर्ण झालेच पाहिजे, असा स्पष्ट इशारा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते चंद्रपूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत बोलत होते.
या बैठकीला राज्याचे वित्त, नियोजन तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर-गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आमदार नानाभाऊ शामकुळे, आमदार संजय धोटे, कीर्तीकुमार भांगडिया, आमदार सुरेश धानोरकर,मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, मुख्यवनसंरक्षक मुकूल त्रिवेदी त्रिवेदी आदींसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.