Breaking News

कृषी विभागाच्यावतीने 21 ते 25 फेब्रुवारीला जिल्हा कृषी महोत्सव


नाशिक, - ‘जिल्हा कृषी महोत्सव 2018’ चे 21 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात येणार असून महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीष महाजन व ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कृषी महोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक अशोक कांबळे, उपसंचालक नरेंद्र आघाव, प्रमोद वानखेडकर, कैलास शिरसाठ, लिड बॅक तथा बॅक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक बी.व्ही. बर्वे, कृषी अधिकारी हेमंत काळे, गोकुळ वाघ, कैलास खैरनार आदी उपस्थित होते.
महोत्सवामध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येईल तसेच कृषी साहित्य, उत्पादने यांच्या विक्रीसाठी दालने, कृषी सेवांशी संबंधित उत्पादक, वित्तीय संस्था, शेतकरी महिला गटांची खाद्य पदार्थांची दालने, कृषी माल प्रक्रिया उद्योजकांचाही यामध्ये सहभाग आहे. तसेच यासह सिंचन, कृषी तंत्रज्ञान, गृहोपयोगी वस्तु, धान्य, खाद्य पदार्थांची दालने असतील. रेशीम विकास विभाग, वनीकरण, पशुसंवर्धन, मत्स उद्योग कृषी विज्ञान केंद्र, नाबार्ड, फलोत्पादन, पणन मंडळ आदी विविध शासकिय यंत्रणांचे स्टॉल्स असतील. 
यावेळी शेतकर्‍यांच्या समस्या व अडचणींवर परिसंवाद, व्याख्यानांच्या माध्यमातून विचारमंथन घडवून आणण्यात येणार असून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महोत्सवाचा उपयोग केला जाणार आहे.