Breaking News

हल्लाबोल यात्रा 16 फेब्रुवारीला नाशिक जिल्हयात धडकणार

नाशिक, दि. 28, जानेवारी - राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातून हल्लाबोल यात्रा काढत सरकारच्या कारभारावर टिकेची झोड उठवली आहे. विदर्भ, मराठवाडयातून प्रवास करत ही यात्रा 16 फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्हयात दाखल होत आहे. तीन दिवसीय या यात्रेत जिल्हयाच्या विविध ठिकाणी सभा घेण्यात येणार असून सरकारचा कारभार जनतेसमोर मांडण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रभारी माजीमंत्री आ. जयंत पाटील यांनी सांगितले.

आज नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामकाजाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. यावेळी त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला फडणवीस सरकारच्या कारभाराविरोधात ही यात्रा काढण्यात येत असून राज्य सरकारने जाहीर केलेली शेतक-यांची कर्जमाफी फसवी आहे.


कापसावरील बोंडअळीच्या नुकसानीबद्दल शासनाने तीन स्तरावरून नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात यासंदर्भातील अंमलबजावणीच्या संदर्भात साशंकता आहे. तुरीच्या शासकीय खरेदी केंद्रास अद्याप परवानगी नसून फक्त ऑनलाईन नोंदणी सुरू आहे.घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. शासन प्राथमिक शाळा बंद करीत आहे. अशा विविध मुदयांवर सरकार जनतेची दिशाभुल करत असून या विरोधात आता राष्ट्रवादीने युती सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.