Breaking News

पाणी फौंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत भारतीय जैन संघटनेचे योगदान

सातारा, दि. 27 (प्रतिनिधी) : आमीर खान यांच्या पाणी फौंडेशनने महाराष्ट्रात घेतलेल्या वॉटरकप स्पर्धेत भारतीय जैन संघटनेने 490 पोकलेन आणि जेसीबी  मशिन्सच्या सहाय्याने 336 गावे पाणीदार बनविण्याचे आपले योगदान दिले असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख यांनी आज  पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सातारा जिल्हा अध्यक्ष सुजीत मुथा, विकल्प शहा, नंदकिशोर लोंढे, जवानमल जैन, श्रीकांत भंडारे (खंडाव), हणमंत खोत (माण)  उपस्थित होते. दरम्यान सातारा जिल्ह्यातील माण, खटाव व कोरेगाव तालुक्यातील 61 गावांत सोळा जेसीबी व 26 पोकलेनच्या माध्यमातून हे काम करण्यात आले  असल्याचेही त्यांनी सांगितले. 
पारख म्हणाले, श्रमदानावर आधारित या स्पर्धेत सर्वच कामे मानवी हातांनी होत नाहीत, त्यांना मर्यादा येतात. अशावेळी जैन संघटनेने हाताना यंत्राची साथ देत  विक्रमी काम पूर्ण करण्यास मदत केली. एकाच वेळी विविध गावात या यंत्रांची गरज भागविताना भारतीय जैन संघटनेला आपला आपत्ती निवारण काळातला अनुभव  अत्यंत काटेकोर नियोजन आणि महाराष्ट्रासोबतच अन्य राज्यात असलेले संपर्क जाळे याचा मोठा फायदा झाला. या वर्षी पाणी फौंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत 13  जिल्ह्यातील 30 तालुक्यांतील गावांचा समावेश होता. भारतीय जैन संघटनेने या स्पर्धेत श्रमदानाचा टप्पा पूर्ण करणार्‍या सर्व गावांना त्या गावातील कठीण कामे  जेसीबी - पोकलेनच्या माध्यामातून करुन देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. फक्त दीड महिन्याच्या कालावधीत एवढे मोठे काम पूर्ण करण्याचे आव्हान बीजेएस  समोर होते. यासाठी 30 तालुक्यात 42 लोकांच्या नियुक्ता करुन सर्व सरपंचांशी व गावकर्‍यांशी संपर्क करण्याची यंत्रणा उभी केली होती. तसेच प्रत्येक जिल्ह्यात  भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकार्‍याच्या समित्याही नियुक्ता केल्या होत्या. एक वेगळे सॉफटवेअर बनवून काम करण्यास सुरुवात करण्यात आली. अनेक अडी -  अडीचणीचा सामना करीत करीत, स्पर्धा संपल्याच्या दिवसापर्यंत बीजेएसने एकूण 271 जेसीबी आणि 219 पोकलेनद्वारे 336 गावांत मोठ्या प्रमाणावर काम केले.  नियोजनासाठी शांतिलाल मुथ्था यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे सांगून पारख म्हणाले सर्व गावांची मागणी असल्यामुळे आम्हाला अनेक गावांना वेळ आणि मशीन्स  वाढवून द्यावे लागले. या मशिनच्या माध्यमातून जिल्ह्यात कम्पार्टमेंट बंडिग, कंटूर बांध, सीसीटी, डीप सीसीटी, माती नाला बांध (नवीन आणि दुरुस्ती), नाला  रुंदीकरण व खोलीकरा, शेततळे, विहीर पुनर्भरण, पाझर तलाव (दुरुस्ती) अशी कामे करण्यात आली. अनेक गावात रात्रदिवस श्रमदान आणि मशीनचे काम सुरु  ठेवून गावकर्‍यांनी दुष्काळ हटविण्यासाठी ’दुष्काळाशी दोन हात’ करीत लढा सुरु ठेवला.