Breaking News

केबीसीतून नाही घेतला धडा, खाकीच्या पाठींब्याने फसवणूकीचा राडा औरंगाबादनंतर नाशिकमधून फसवणुकीचे उज्वल कारस्थान

नाशिक/कुमार कडलग :- महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील गोर गरीबांची आर्थिक लुट करणार्‍या केबीसीच्या दरोडेखोरीतून कुठलाच धडा न घेता पोलीस यंत्रणा नव्याने आर्थिक फसवणूक करणार्‍या चिटर्स मंडळींना पाठबळ देऊ लागल्याने आर्थिक फसवणूकीचा गोरख धंदा तेजीत आला आहे. नाशिक या गोरखधंद्याची राजधानी बनू पहात असून या विरूध्द आवाज उठविणार्‍या व्यक्तीला खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यात अडकविण्याचा खोटारडेपणा तितक्याच साळसुदपणे केला जात आहे. हा प्रकार एव्हढा खालच्या थरावर पोहचला आहे की बातमी छापावी की नाही असा विचार माध्यमांचे प्रतिनिधीही करू लागले आहेत. 


या पार्श्‍वभूमीवर नाशिकच्या महात्मानगर भागातून आपला कारभार चालविणार्‍या उज्वलम अग्रो मल्टी स्टेट को. ऑप सोसायटी, लि. या संस्थेविरूध्द अत्याचार विरोधी कृती समितीने दिलेल्या निवेदनावर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तालय काय कारवाई करणार हे पाहणे विशेष औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान संबंधित उज्वलम अग्रो मल्टी स्टेट को.ऑप. सोसायटीच्या कार्यशैलीची चौकशी व्हावी, अशी मागणी यापुर्वी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्या अर्जावर पोलीसांनी चौकशी केली नाही उलट त्यानंतर काही दिवसात अर्जदारांवर खंडणी मागीतल्याचा गुन्हा दाखल झाल्याने एकूण प्रकरण संशयाच्या गर्तेत सापडले. तर दुसरीकडे दहशत निर्माण झाल्याने तक्रार करण्यास पुढे येण्याचे धाडस कुणी करीत नाही.


केबीसी प्रायव्हेट लि. च्या संचालकांनी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्र आणि अन्य राज्यातील हावर्‍या प्रवृत्तींना अल्प मुदतीत दामदुप्पट कमाईचे अमिष दाखवून करोडो रूपयांना गंडा घातल्याचे प्रकरण ताजे आहे. केबीसीने गंडा घालण्यापुर्वी दोन वर्षे आधी नाशिक पोलीसांना या गोरखधंद्यांची कल्पना लोकमंथनने दिली होती. सतत पाठपुरावा केल्यानंतर जत्रा हॉटेलजवळ असलेल्या कार्यालयावर आर्थिक गुन्हे शाखेने मारलेल्या छाप्यात लोकमंथनने केलेल्या आर्थिक गैरव्यवहार दाव्याला दुजोरा देणारे कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.त्यानंतरही पोलीसांनी केलेल्या दुर्लक्षामुळे दिड दोन वर्ष केबीसीचा फसवणूकीचा व्यवहार बिनबोभाट सुरू राहीला. आणि अचानक गाशा गुंडाळून संचालक सिंगापुरला पसार झाले होते. आज हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यानच्या काळात अनेकांनी केबीसीच्या गंगेत आपले हात ओले करून घेतले.

हा सारा फ्लॅशबॅक या ठिकाणी उधृक्त करण्याचा हेतू एव्हढाच की या सर्वांच्या साक्षीने केबीसीचे कांड घडले असतानाही त्यातून कुणीच धडा घ्यायला तयार नाही. ना गुंतवणूकदार नवी गुंतवणूक करताना मागची ठेच लक्षात घेतात, ना पोलीस अशा भामट्यांवर नजर ठेवण्याची तसदी घेताना दिसतात. या उदासिनतेला संधी समजून काही भामट्यांनी नाशिकला फसवणूकीचे केंद्रबिंदू बनवून महाराष्ट्रातील ठिकठिकणच्या गुंतवणूकदारांना ठगविण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे. या भामट्यांमध्ये औरंगाबादमध्ये सन 2011 मध्ये ओरिएन्टल ईन्शुरन्स कंपनीच्या नावावर लोकांना शेकडो कोटींचा गंडा घालणार्‍या नवजीवन लाईफ केअर इन्शुरन्स कंपनी संचालकाचे नाव पुढे येत आहे.

हा ठग नाव बदलून लोकांना फसवित असल्याची वाच्यता असून नाशिकमध्ये उज्वलम अग्रो मल्टीस्टेट को. ऑप. सोसायटी लि. नावाने धंदा करीत असल्याचा आरोप अत्याचार विरोधी कृती समितीने केला आहे.
या भामट्याने वेगवेगळ्या नावाने तब्बल नऊ फर्म सुरू केल्या असल्याची माहीती उपलब्ध आहे. औरंगाबादसह नाशिकमध्येही या इसमाविरूध्द वेगवेगळे खटले प्रलंबीत आहेत, याची जाणीव पोलीस यंत्रणेला आणि जिल्हा प्रशासनाला असतानाही त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी चौकशीची मागणी करणार्‍यांनाच खोट्या गुन्ह्यात अडकविले जात आसल्याने पोलीस ठगांची नवी युती अस्तित्वात येत आहे की काय, अशी शंका येण्यास वाव मिळत आहे. (क्रमशः)


उद्याच्या अंकातः
* कोण आहे हा ठग...
* काय आहे औरंगाबादचे प्रकरण...
* कुठले गुन्हे दाखल आहेत....
* पोलीसांची भुमिका संशयास्पद कशी....
* काय आहे या सर्वांची मोडस आपरंडी