लिंबू बाजारभावावर पसरले मंदीचे सावट
राज्यात लिंबू उत्पादनात तालुक्याचा मोठा वाटा असून लिंबू या पिकापासून शेतकऱ्यांना रोख स्वरुपात त्वरित रक्कम मिळत असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या गरजा लिंबू विक्रीतून शेतकरी भागवितात.आज लिंबू तोडणी, प्रतवारी, यासाठी लागणारा मजुरांचा पगार व मार्केटला आणण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च हि निघत नसल्याने लिंबू बागायतदार शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करताना दिसत आहे. एरवी लिंबू बागायतदार हा थोडासा आर्थिक सुबत्ता असलेला मानला जाई. परंतु बाजारभाव पडल्याने लिंबू बागायतदार शेतकरी लिंबू विक्री करणारे छोटे व्यापारी सध्या आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागाचे बाजारपेठेवर त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. गेल्या वर्षी तालुक्यात अत्यल्प पडलेल्या पावसामुळे लिंबू बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी टँकरने पाणी घालून बागा जगविल्या. अशा परिस्थितीत बाजार कमी झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.