Breaking News

निरुद्योगी लोकांना उत्तर देण्याची गरज नाही- रामदेवबाबा

नागपूर, दि. 13, सप्टेंबर - देशासाठी काहीच योगदान नसलेल्या आणि दिवसभर वायफळ बडबड करणार्‍या निरुद्योगी लोकांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याची गरज  नसल्याचा प्रतिटोला योगगुरू रामदेवबाबा यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना लगावला. राजवाडा पॅलेसमध्ये आयोजित ‘पतंजली’ वितरकांच्या संमेलनासाठी ते  आज, मंगळवारी नागपुरात आले होते.
आखाडा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या ढोंगी बाबांच्या यादीत योगगुरू रामदेव बाबांचे नाव नसल्याबाबत सवाल करत काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह  यांनी ट्विटरच्या माध्यमातून रामदेवबाबांना टार्गेट केले होते. यासंदर्भात रामदेवबाबा यांना विचारले असता त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सांगितले  की, देशाला साधू, संतांची प्राचिन परंपरा लाभली आहे. राम रहिम व इतर ढोगींबाबामुळे त्या परंपरेला गालबोट लागते यात शंका नाही. परंतु, एक -दोन पाखंडी  लोकांवरून संपूर्ण संत समाजाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे योग्य नाही. जो बाबा भक्तांची फसवणूक आणि चुकीचे कार्य करत असेल त्याच्यावर कारवाई  झालीच पाहिजे असेही बाबा रामदेव यांनी ठणकावून सांगितले.