Breaking News

सिंचन व्यवस्थापन करणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍यांना पोलिस संरक्षणाची मागणी

। धक्काबुक्की,जीवे मारण्याच्या धमकीचा कर्मचारी संघटनेकडुन जाहिर निषेध

अहमदनगर, दि. 27 - मुळा पाटबंधारे विभागातील उपविभागीय अधिकारी शिरसाठ यांना शेतकर्यांनी धक्काबुक्की करुन, दमदाटी केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. सिंचन व्यवस्थापन करणार्या अधिकारी व कर्मचार्यांना वारंवार धक्काबुक्की होवून, जीवे मारण्याची धमकी दिली जात असताना त्यांना पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. पोलिस संरक्षण न मिळाल्यास मुळा पाटबंधारे विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी सामुहिक रजेवर जाणार असल्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात राज्याध्यक्ष योगीराज खोंडे, मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर.पी. मोरे, किरण देशमुख, विलास पेद्राम, श्रीकांत शिर्शिकर, सौ.भोर, पाटील, श्याम बुधवंत, एल. डब्ल्यु. शिरसाठ आदिंसह मुळा पाटबंधारे विभागाचे  अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रारंभी नगर औरंगाबाद रोड येथील पाटबंधारे विभागाच्या प्रवेशद्वारात निषेध सभा झाली. यावेळी उपस्थित कर्मचार्यांनी घडलेल्या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला. मंगळवार दि.25 एप्रिल रोजी नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील मुळा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी एल. डब्ल्यू. शिरसाठ व त्यांच्या सहकार्यांना मुखाशी शेतकर्यांनी झुंडशाहीने धक्काबुक्की करुन, दमदाटी केली. तसेच या अधिकार्यांना पाटामध्ये ढकलून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सोमवार दि. 24 एप्रिल रोजी शेतकर्यांनी अनाधिकृतपणे वितरिकेचा विसर्ग वाढविला व पोलिस कारवाई केल्यास अधिकारी, कर्मचार्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. घोडेगाव कार्यालयावर 26 मार्च रोजी अज्ञात इसमांनी पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच अमरापूर अंतर्गत सिंचन शाखा कासार पिंपळगावच्या हद्दीतील पाडळी गावात सोमवारी रात्री शेतकर्यांनी शासकीय वाहनाला घेराव घालून पेटवून देण्याचा प्रयत्न केला व अधिकारी, कर्मचार्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. वारंवार सिंचन व्यवस्थापन करणार्या अधिकारी कर्मचार्यांना धक्काबुक्की करुन, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असताना, त्यांना स्थानिक स्तरावर पोलिस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनांमळे कर्मचार्यांचे मनोधैर्य खचले असून, काम करण्याची मनस्थिती राहिली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना देण्यात आले.