युवा टीम इंडियाची विजयी सलामी
ढाका, 28 - इशान किशनच्या युवा टीम इंडियाने अंडर-19 विश्वचषकात विजयी सलामी दिली आहे. बांगलादेशात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या साखळी फेरीत, आपल्या सलामीच्या लढतीत भारतानं आयर्लंडवर 79 धावांनी विजय साजरा केला.
सर्फराज खान आणि वॉशिंग्टन सुंदर भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या सामन्यात आयर्लंडच्या गोलंदाजांनी भारताची अवस्था 4 बाद 55 अशी बिकट झाली होती. पण सर्फराज आणि वॉशिंग्टनने 110 धावांची भागीदारी रचून भारताचा डाव सावरला. सर्फराजने 70 चेंडूंमध्ये 7 चौकारांसह 74 धावांची खेळी केली तर वॉशिंग्टनने 62 धावा फटकावल्या. त्यामुळेच भारताला 50 षटकांत नऊ बाद 268 धावांची मजल मारता आली. भारतीय गोलंदाजांनी मग आयर्लंडचा डाव 189 धावांत गुंडाळला. राहुल बाथामने सर्वाधिक तीन विकेट्स काढल्या.