राम मंदिर खुले करणे ही राजीव गांधींची चूक : प्रणव मुखर्जी
नवी दिल्ली, 29 - अयोध्येतील राम मंदिर खुले करणे हा राजीव गांधींचा चुकीचा निर्णय होता. तसेच बाबरी मशिद पाडणे हा पूर्ण विश्वासघात होता, ज्यामुळे भारताच्या प्रतिमेला तडा गेला, असे मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या आत्मकथेत व्यक्त केले आहे.
प्रणव मुखर्जी यांच्या ‘द टर्ब्युलेंट इयर्स : 1980..1996’ या पुस्तकाचे उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांच्या हस्ते गुरुवारी दिल्लीत प्रकाशन झाले. मुखर्जी लिहितात, सहिष्णु आणि विविधतेत एकता अशी असलेली भारताची प्रतिमा या घटनेने नष्ट झाली. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्याने सामाजिक अन्याय कमी झाला. पण 1989 ते 1991 या काळात हिंसा आणि भारतीय समाजातील फूट सर्वाधिक पाहायला मिळाली, असेही पुस्तकात नमूद केले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी लिहिले आहे की, जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद आणि सीमेपार दहशवाद सुरु झाला. राज जन्मभूमी मंदिर, बाबरी मशिदीच्या मुद्द्यांनी देश हादरला.